सातू पीठ – उत्कृष्ट बलवर्धक आयुर्वेदिक तर्पण ( Sattu – Ayurvedic Tonic ) सातू पीठ – (सत्तू) वर्षभर विशेषतः उन्हाळ्यात सर्वांना हितकर व पोषक , त्वरित तरतरीत करणारे खाद्य म्हणजे पारंपरिक सातूचे पीठ साहित्य
  • जव (Barley)(जवस नव्हे) तूस काढलेले वा तसेच पण चालतात – 1 किलो
(जव घेणे शक्य न झाल्यास चांगले गहू घ्यावेत. किंवा दोन्ही अर्धे अर्धे घ्यावे.)
  • गोड डाळ्या (चिवड्यात टाकतात त्या) किंवा दाळ – 250 ग्राम
  • जीरे – २५ ग्राम
  • वेलची पूड – ५ ग्राम
  • सुंठ – २५ ग्राम
सातू पीठ करण्याची पद्धत प्रथम जव/गहू पाण्यात धुवून घ्यावे. लगेच वाळवुन कोरडे होऊ द्यावे. नंतर हे जव/गहू खमंग भाजून घ्यावे. जमल्यास भट्टीवरून भाजून आणावे. जर डाळ्याऐवजी दाळ घेतली असेल तर ती सुद्धा भाजून घ्यावी. भाजलेल्या जव/गव्हात डाळ्या, जीरे, सुंठ भरड मिसळावे. हे सर्व एकत्र दळून घ्यावे. (जर तुसा सकट जव घेतले असतील तर दळण एकदा चाळून घ्यावे तूस वेगळी होतात. हे महत्वाचे अन्यथा काहींना खाताना त्रास होऊ शकतो.) ह्यात पीठ थंड झाल्यावर शेवटी वेलची पूड मिसळावी. सातू पीठ खाण्याची पद्धत व नियम बनवण्याची पद्धत –  एका मध्यम व्यक्तीला 4 चमचे सातू पीठ व चवी प्रमाणे गुळाचे पाणी वा साखरेचे पाणी घेऊन हे मिश्रण एकत्र करावे. अगदी घट्ट नाही व अगदी पिण्यासारखे पातळपण नाही असे मिश्रण करावे. कोरडे वा अगदी पातळ पाणी नसावे. ह्यात २ चमचे तूप व १ चमचा मध मिसळावे. (चव उत्तम होते. आवडत नसेल तर न टाकता देखील खावे. प्रसंगी थोडं घाणीच खमंग तीळ तेल पण टाकता येत पण चव थोडी बदलते.) पौष्टिक सातू पीठ  नैवेद्य दाखवावे. इष्ट देवाला ते अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून सेवन करावे. म्हणजे चांगल्या मनाने ते अंगी लागेल. खाण्याची वेळ – सामान्य पणे सर्वांनी हे सकाळी न्याहारी म्हणून घ्यावे. (रात्री खाऊ नये.) अति महत्वाचे नियम
  • ह्या पदार्थावर पाणी पिऊ नये
  • भोजनानंतर हे खाऊ नये.
  • रात्री खाऊ नये तसेच अति पावसाळ्यात हा पदार्थ खाऊ नये.
  सातू पिठाचे फायदे
  • तत्काळ ऊर्जा देते.
  • कुपोषण लवकर दूर होते.
  • वाढत्या वयाच्या सर्व अन्न घेणाऱ्या लहान मुलांपासून वृद्ध वयस्क माणसांना हे उत्तम पोषण देते.
  • उन्हाळ्यात होणारी आगआग, लाहीलाही कमी होते, सारखे पाणी पाणी होत नाही. तसेंच येता जाता खाय खाय कमी होते. तृप्ती येते.
  • प्रवासातही सहज करता येईल असा रेडि टू इट असा मेन्यू आहे. उन्हाळी दीर्घ प्रवासात उत्तम आहे.
  • मधुमेही , डायबेटीस रुग्ण विना गूळ-साखर फक्त पाणी मिक्स करून हा पदार्थ नक्कीच घेऊ शकतात.
  • मलावरोध तक्रार असेल तर त्यालाही आराम मिळतो. (मात्र त्यासाठी जव घ्यावे गहू घेऊ नयेत).
  ह्याच डायट मेन्यू चा वजन वाढवणे व वजन कमी करण्यासाठी देखील उपयोग होतो.   अधिक माहितीसाठी डॉ आनंद कुलकर्णी व डॉ अमृता कुलकर्णी अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर हरिनिवास, नौपाडा, ठाणे प. संपर्क – 9869105594 / 8779584840