भाजी ( Vegetables ) – भाग 10
कडधान्य भाज्या
वाल –
वाल हे भूक चांगली असल्यासच खावी. हा सुद्धा पचनास अत्यंत जड असा प्रकार होय. जास्तीचे श्रम करणाऱ्यानी तसेच इतर पौष्टिक पदार्थ न परवडणार्यांनी वालाची उसळ खावी. उत्तम पोषण होते. अति प्रमाणात भूक, सारखी खावखाव होते, काहीही खाल्ले तरी समाधान होत नाही अशा वेळी वालाची उसळ खावी. वालाने सुद्धा अतिशय वात / पोटात वायू धरतो म्हणून जपून वापर करावा.
चवळी –
चवळीची उसळ बलवर्धक म्हणून प्रसिद्ध आहे. पोटात आग होऊन भसरट शौच होणाऱ्यास याचे सूप द्यावे. मळ कमी झालेल्या रोग्यांना उपयोगी आहे. भूक नसतांना चवळी खाऊ नये. मिरची , मसाले भरपूर वापरू नये.
मटकी –
मटकीला मोड आणून त्याची उसळ करतात. याची उसळ करतांना पाणी कमी वापरून उसळ करावी. पोटात जंत असणाऱ्यानी वापरू नये. मटकी रोजच्या वापरात ठेऊ नये.
काही भाज्या यातून वर्णन करायच्या राहून गेल्या असतील परंतु भाज्यांबद्दल काही गोष्टी थोड्या प्रमाणात का होईना लक्षात आल्या असतील. अन्य भाज्यांविषयी शंका कुशंका असतील तर जवळील आयुर्वेदीय वैद्याला संपर्क करू शकता किंवा खुद्द लेखक उपलब्ध आहेच.
भाज्यांबद्दल संक्षेपाने – ( शेवटी भाज्यांचा वापर कसा करावा याबद्दल सारांशाने पाहू. )
- आहारात भाज्या कमी खाव्यात. ( पोळीच्या अपेक्षेने )
- कच्च्या भाज्या खाणे हे पचायला आणखीनच जड पडते म्हणून खाणे शक्यतो टाळावे.
- पोटदुखी असताना भाज्या कमी खाव्यात किंवा शक्यतो टाळाव्यात.
- जंतांची पैदास-वाढ जास्त असताना भाज्या कमी खाव्यात किंवा शक्यतो टाळाव्यात.
- जास्त प्रमाणात मल जाणे ( संडासला अधिक होणे ) असे असताना भाज्या कमी खाव्यात किंवा शक्यतो टाळाव्यात.
- पोटात गैसेस धरणे इ. तक्रारी असताना भाज्या कमी खाव्यात किंवा शक्यतो टाळाव्यात.
- प्रत्येक भाजी प्रत्येकाला सुट ( सात्म्य ) होईल असे नाही म्हणून काही त्रास झाल्यास आयुर्वेदीक वैद्याचा सल्ला घ्यावा.
- अतिशय कोवळ्या भाज्या ( मुळा सोडून ), रोगीट भाज्या, जुनाट भाज्या खाऊ नयेत.
- भाज्या नळाच्या पाण्याने स्वच्छ धुवूनच वापराव्यात.
- बटाटा इ कंदमूळ भाज्या पचनास अत्यंत जड असतात म्हणून भूक कमी असताना खाऊ नये.
- आमटी, उसळ, डाळ, मोड आलेले इ प्रकार उत्तरोत्तर पचायला अत्यंत जड असतात. त्यामुळे भूक चांगली असतांनाच यांचा वापर करावा.
- भाज्याच्या बरोबर नेहमी तेल किवा तूप यांचा वापर जरूर करावा.
- गसेस, असिडीटी इ.च्या तक्रारी असणाऱ्यानी भाज्या आयुर्वेदीय वैद्याच्या सल्ल्याने वापराव्यात.
म्हणून योग्य भाज्या, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात खायला हव्यात. आहाराच्या समान कोणतेही औषध नाही, केवळ योग्य आहारानेच अनेक रोग बरे होतात. पथ्यपालन करणाऱ्यास औषधांची आवश्यकता लागत नाही. म्हणून पथ्यास अनन्यसाधारण महत्व आहे. कोणताही साईड इफेक्ट नाही, व थोडा विचार केला तर पथ्य पालन करण्यास फार कष्ट लागत नाहीत. फक्त इच्छा असणे गरजेचे आहे. कुठल्याही गरजेच्या गोष्टीचे अति किवा कमी असे प्रमाण केल्यास त्रास हा होणार आहेच. म्हणून सम प्रमाणात, गरजेपुरतेच खावे.
भाज्यांमुळे अनेक जणांना त्रासही होतात. त्यावरील उपायांसाठी आयुर्वेदीय वैद्य / डॉक्टर सदैव तुमच्या मदतीसाठी तयार असतात. त्यांच्याशी संपर्क साधावा.
– क्रमशः
– वैद्य आनंद कुलकर्णी M.D. (Med. Ayu),
CYEd, DYA, MA (Sanskrit)
अमृता आयुर्वेद पंचकर्म सेंटर, नागेश टॉवर, हरिनिवास, ठाणे प. मो. 9869105594
Old articles about vegetables available